साद सागराची, सफर किनारपट्टीची: पहिला दिवस

Thursday, October 8, 2009

साद सागराची, सफर किनारपट्टीची: पहिला दिवस

सगळी तयारी झाली. प्लॅन ठरलाय आणि एकदाची १ ऑक्टोबरचा वर्किंग वीकडे संपला.

आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि सातारा रोडवर मुंबईकर, नागपूरकर सगळ्या मंडळींनी वेळेवर हजेरी लावली आहे.
बाईक्स नुकत्याच ट्रकमध्ये लोड करुन कोल्हापूरला पाठवल्या आहेत. होपफुली त्या वन पीस पोचतील. एका जरी बाईकला काही झाले तर आमच्या वेळापत्रकाची टोटल ’लागणार’ आहे. तरी पहिल्या दिवशीच्या प्लॅन मध्ये बफर टाईम जरा सैल हातानेच ठेवलाय. पावसाच्या बातमीने जरा काळजी पण वाटते आहे.

थोड्याच वेळात आम्ही पुन्हा स्वारगेटला एकत्र भेटू आणि त्याचवेळी एक ओळखपरेड पण होइल. पहिलाच दिवस आहे तर खायला थोडे ’घासफूसच’ बरे राहील. म्हणून मग वैभव आणि मी 'प्युअर वेज' नावाचा प्रकार खाल्ला आहे. आणि त्याच्याच फ़्लॅटवर TP करतो आहे. मंगेश मुंबईवरुन आलाय. सॅंडी बॅगबरोबर झटापट करतोय. आणि यावेळी भावानाचा फोन आला. तिने एक स्टंट मारलाच. बस रात्री साडेअकराला सुटणार आहे आणि तिने मला दहा वाजता फोन करुन तिच्याकडे हेल्मेट नही अशी ’खुशखबर’ दिली आहे (टाळ्या...!!!). तरी मी तिला गेल्या रविवारीच विचारले होते की माझ्याकडे एक्स्ट्रा हेल्मेट आहे आणि ते तिला हवंय का? तेव्हा चांगली नाही म्हणाली की हो! पण काय करणार? तिची हेल्मेट वाली मैत्रीण आज ऑफिसलाच आली नाही. बाईक ट्रिपचा शून्य नंबरचा नियम आहे ’helmets compulsory’. मग तिथून पुढे धावपळ आणि शोधाशोध. दुकाने पण बंद झालीत. मग एक मित्राला फोन केला आणि मग सौरभने हेलमेट आता स्वारगेटला तिच्याकडे आणून दिलंय.

जेवण उरकले आणि सगळे बॅगा आणि भरलेली पोटे सावरत स्वारगेटला पोचलोय.

आता ओळखपरेड:
मी पंकज ऊर्फ पॅंकी ऊर्फ भटकंती unlimited
वैभव ऊर्फ बॅबो ऊर्फ हैबती
संदीप ऊर्फ सॅंडी
मंगेश ऊर्फ मॉंग ऊर्फ मॅंगी
भावना ऊर्फ मॅचिंग नेलपेंटवाल्या मॅडम
आम्रपाली ऊर्फ मॅंगोलिझर्ड ऊर्फ ’मुंडी तेरी’
पूजा मॅडम
निकुंज ऊर्फ निक
प्रतीक म्हणजे पॅट्रिक ऊर्फ पॅट
सुयोग भाई
राका डॉन
दीप म्हणजे बाबा अफगाणी
सम्यक भाऊ
आणि श्रीकांत म्हणजे घंटासिंग ऊर्फ शिक्रांत- रडू येईल असे जोक सांगणारा.

म्हणजे अवघा संयुक्त महाराष्ट्र हजर झाला. एक सो एक सगळे पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर...!!!

कोलापूरसाठी बस येइल आणि आम्ही बुकिंग आधीच केले असल्यामुळे ऐटीत बसुन रवाना होऊ.

अरे ही काय, आलीच बस. पण लहान पिक-अप बस... ती आम्हाला सिंहगड रोडच्या त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन चालली आहे आणि मग तिथून पुढे वॉल्वोने कोल्हापूर. बॅगा नीट ठेवून आम्ही (कमीत कमी बाईक्स चालवणारे गडी) मिळेल तेवढी झोप पदरात पाडण्याचा प्रयत्न करू. पण असे काही फोन असतात जे रात्रीच करावे लागतात, ते पण खुसर-फुसर करत बोलायचे असतात. तासाभरात ते संपून झोप लागली. कोंडुसकरांची ही नॉन स्टॉप पुणे-कोल्हापूर बस एक छान सेवा आहे. आणि त्याहून उच्च आहे पुणे-बंगलोर हायवे. पोटातले पाणीही न हलता आम्ही पहाटे साडेतीनलाच कोल्हापूरला पोचलोय. बऱ्यापैकी आरामशीर झोप झली. महामंडळाच्या बसपेक्षा जास्त दिलेले पैसे वसूल झाल्यासरखे वाटले. आता पुढचे काम आहे बाईक्स घेउन येणारा ट्रक शोधणे, बाईक्स उतरवणे आणि फ्रेश होऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणे.

नाक्यावर उतरलो. ट्रक समोर वाटच पाहत होता. आणि आल्यावर बाईक्स उतरवून घेतल्या. पण थोडी निराशा झाली. माज़्या बाईकचा आरसा त्याच्या लोखंडी बार सहित कुणीतरी काढून नेला. दीपची गाडी खाली पडून थोडे फायबरचे आणि टेल-लॅम्पचे थोडे नुकसान झाले. पण राकेशची बाईकच्या टाकीची वाट लागली होती. एक वाईट डेंट पडला होता, कमीत कमी ४ इंच व्यासाचा आणि एक दीड इंच खोल. नशिबाने सगळ्या बाईक्स चालू स्थितीत आहेत.

स्टँडवर पोचल्या पोचल्या एकेक चहा आम्ही सर्रकन घशाखाली सोडला. सॅन्डीच्या घरी सगळे फ़्रेश झालो. सकाळी जसे काही विशिष्ट राग गायले जातात तसे सकाळी मारण्याचे जोक्स पण वेगळे असतात. त्यात वाघ मारणे, गाडी रद्द होणे, डाउनलोड एरर, त्यामुळे येणारे ऑडिबल अलर्ट्स असे शब्दप्रयोग चालतात. आमचा असा पाचकळपणा चालला होता. आमचा सॅंडी गडी नवीन घर बांधतोय. म्हणजे लवकरच विकेट पडणार हे आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटेल का? काकूंनी म्हणजे सॅंडीच्या आईने केलेले वाफाळते उपीट आणि कडक चहाने जीव सकाळपुरता का होईना तृप्त झाला. भावनाने मॅचिंग नेलपेंट लावली, आम्ही जड बॅगा गाडीला बांधल्या. त्याच वेळी आम्रपाली गाडीवर बसायच्या आधीच खाली पडली. शेजारी श्रीकांत होता. म्हणजे मुलींना खाली पाडण्याचा मागच्या Coastal Prowl चा रिवाज त्याने कायम ठेवला होता (मागच्या वर्षी थांबलेल्या गाडीवरुन २ जणींना पाडण्यात यश आले होते त्याला). हातावर साख्रर घेऊन आम्ही निघालो. गाड्या ओरडत होत्या "माझा खाऊ मला द्या". मग मोर्चा पेट्रोल पंपाकडे वळवला. टाक्या फुल्ल केल्या आणि मंदिराकडे कूच केले. सकाळी लवकर पोचल्यामुळे विशेष गर्दी नही आणि दर्शन पण व्यवस्थित घडले.

मंदिराच्या आवारात गाड्या ओळीने लावून नारळ फोडून श्रीगणेशा केला. सगळ्यांचा सुंदरसा ग्रुप फोटो काढला.


गाडीचे जेवाय-जेवाय करुन झाले होते. टाक्या फुल्ल करून झाल्यात. स्पीडोमीटर नोंदवून घेतलाय. आणि सव्वा आठला सुरु झाला आमचा खरा Coastal Prowl . टायरमधे हवा चेक करणे बाकी आहे पण. उजव्या हाताला पावसाने तुडुंब भरलेल्या रंकाळ्याला वळसा घालून आम्ही फोंडा घाटाकडे मार्गस्थ निघालोय. थोडे पुढे येऊन एक टायरची टपरी दिसली. कोल्हापूरच्या सगळ्याच गोष्टी दणदणीत-रांगड्या. आपण पुण्या-मुंबईत हवा भरताना पुढे आणि मागे अनुक्रमे २५-३५ युनिट भरतो, पण तिथल्या भाऊने प्रत्येक गाडीत ३५-४० युनिट हवा भरली. आम्ही पण दूरचा प्रवास म्हणून शांत राहिलोय.

रस्त्याची क्वालिटी सुपर भन्नाट आहे. गाड्या छान ७०-८० ने बुंगवता येताहेत. पण आमच्यातला एक १८०क्क चा राका डॉनवाला राक्षस स्पीड पकडत नाहिये. त्यामुळे थोडे अंतर जाऊन आम्हाला थांबावे लागतंय. टॉप क्वालिटी रोडवर असे होणे परवडणारे नाही. फोंडा घाटात प्रवेश करताच मन प्रफुल्लित झाले. गर्द हिरवे जंगल आणि थंड हवा लडिवाळ करून जात आहे. फोंडा गावात चहा मारला, राकाने कटिंगच्या दुकानाबाहेर जॉन अब्राहमच्या फोटोसमोर फोटो काढला आणि दाजीपूरच्या जंगलातून पुढे निघालोय आता. इथे रस्ता तर एकदमच सॉलिड आहे. वरून झाडांची छत्री आणि गाड्या ९० ला सहज टच करताहेत. राका सोबत पॅट्रिकची बुलेट सावकाश येतेय. सुयोग ती चालवत होता. एका वळणावर बुलेट रस्त्याच्या खाली उतरली आणि जरा घसरली. विशेष काही झाले नाही पण हा एक अलार्म कॉल आहे, गाड्या काळजीपूर्वक चालवण्यासाठी.

पुढे आल्यावर एक विस्तीर्ण तलाव लागला. तिथे एका खड्ड्यातून माझी गाडी थांबवताना फूटभर उडाली आणि पडता पडता वाचली. घाटाच्या मधोमध खिंडीत पोचलोय आता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कमानीने स्वागत केलंय, "येवा कोकण आपलाच असा..." आणि ती पार करताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. घाटातून खाली कोकणाचे अदभुत दर्शन घडतय. घाटातून गाड्या वळवत उताराने कोकणात उतरयचे आता. स्वागतच जोरदार पावसाने झाले. पावसाळी जॅकेट्स बाहेर आले. कॅमेरे आणि माणसे झाकली गेली. मुंबई-गोवा महामार्ग NH-17 वर पोचता पोचता पाऊस मुसळधार बनलाय. थांबण्याशिवाय पर्याय नाही. एका बंद टपरीच्या आडोशाला थांबलो. जोर कमी झाल्यावर पुढे निघू. पॅटची बुलेट काही तरी त्रास देतेय. एका बाजूला ओढतेय ती. पुढच्या फोर्कला काही वेल्डिंग करावे लागणार आहे. कणकवलीला पॅट थांबून ते काम करतोय. त्याचा SMS आलाय की तुम्ही मालवणला पोचा मी मागून येतो. कसाल या गावाजवळ आम्ही NH-17 सोडला आणि मालवणसाठी उजवीकडे वळालो. एव्हाना कोकणातला पाऊस म्हणजे काय चीज आहे याची प्रचिती आलीये. धूवून कढतोय तो एकदम. पण आम्ही तेवढेच निगरगट्ट. ३०-३५ किमीचा टप्पा पाऊण तासात पार करोन आम्ही दुपारी अडीचला मालवणात पोचलो आहे.

आता पहिले काम पोटोबा! दुपारी अडीचला जेवायला मिळणे कोकणातल्या मालवणसारख्या लहान गावात असते. आधी मालवणात दोन वेळा येण्याचा अनुभव असल्याने कुठे जेवायला मिळेल हे माहीत आहे आपल्याला. डायरेक्ट गाड्या बांबू हाऊसच्या अंगणात उभ्या केल्या. पावसामुळे पुढचा देवगडला पोचायचा बेत धोक्यात आला होता. त्यात पॅट आणि सुयोग कणकवलीत राहिलेत. त्यांन फोन करुन जेवून घ्यायला सांगितले. पावसामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या बोटी बंद आहेत. त्यामुळे इथे प्रथमच येणाऱ्या पब्लिकची जरा निराशा झाली. पण इलाज नाही. पावसामुळे ’मालवण पाण्यामधे किल्ला’ पाण्यामधेच राहिला. आता २ पर्याय आहेत आमच्याकडे. एकतर तातडीने जेवून देवगड गठणे किंवा मालवणात मुक्काम करुन पुढचा प्लॅन रि-शेड्युल करणे. आम्ही सर्वानुमते पहिला पर्याय निवडला. पॅट आणि सुयोगला डायरेक्ट देवगड गाठायला सांगितले आहे.

कोकणात येउन मासे न खाणे म्हणजे आमच्यासठी पातक, घोर पातक!!! घासफूस पब्लिकची जरा जेवणात निराशाच झाली आहे. पण कोकणात असे होतेच. भाज्यांची मजल पिवळा बटाटा, कोबीची भाजी, मटकीची उसळ अशा ’चवदार’ पदार्थांपलीकडे जात नाहे. कीडेखाऊ लोकांसाठी मात्र सुरमई, बांगडे, पापलेट, हलवा, कोलंबी, तिसर्या (शिंपले), वाम, कोंबडी वडे असे ’साधेसुधे’ खाणाऱ्याचा कलीजा खलास करणारे पर्याय असतात. तिथे आम्ही जेवण चापले आणि वर सोलकढी रेटून हाणली.


रस्ता विचारुन देवगडचा रस्ता धरला. डावीकडे समुद्रातल्या सिंधुदुर्गाचे दर्शन घेत आम्ही सुसाट निघालो. सोलकढी असर दाखवायला लागली आहे. गाडी चालवता चालवता डोळे झाकायला लागलेत. मग आचऱ्याला एकेक कडक कॉफी मारली. आणि ताजेतवाने होऊन पुढे कूच केले. काही अंतर गाड्या बुंगवून झाल्यावर कुणकेश्वराचा बोर्ड दिसल्यावर आपोआप थांबल्या. ८ किमीवरच आहे तर का सोडा म्हणून आत वळालो. मंदिर एकदम प्रशस्त आहे. फार सुंदर. देऊळवाड्याच्या तटालाच भरतीच्या लाटा न्हाऊ घालतात. सागरतीरी सुंदर मंदिर, उसळणाऱ्या लाटा, वाळूची पुळण, काही मासेमारीच्या बोटी, थोडी सागरी धुरकट हवा एकदम छान मूड जमलाय
बऱ्यापैकी फोटो मिळाले आहेत. मग तृप्त मन आणि कॅमेराने परत फिरलो आहे. आता देवगड गाठणे, तेही अंधार पडायच्या आत आवश्यक आहे. पुन्हा गाडीला किक/बटन दिला आणि नॉन स्टॉप देवगडला पोचलो.

पॅट्रिक आणि सुयोगने लवकर आल्यामुळे राहण्याची सोय शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केला पण निवडणुकीमुळे MTDCशिल्लक नाही. तिथून एक नंबर मिळालाय पण शक्यता धूसरच आहे. पण तिथे जाऊन पाहतो तर छन रुम होत्या. ३ रुम्स मिळाल्या. पटकन रक्कम ठरवून सामान टाकले. कोरडे झालो आणि गरम पाण्याने अंघोळ करुन फ्रेश झालो आहोत सगळे. पुन्हा एकदा जवळच वसंत-विजय नावाच्या हॉटेलमध्ये आमचे जेवण विथ फिश झाले आणि तृप्त झालो. वेज लोकांनी पिझ्झावर काम भागवलंय.

सगळी मंडळी भरलेली पोटे सावरत कॅमेऱ्यात दिवसाचा रिव्यू घेऊन छान झोपी गेलीत आणि मे बसलोय ब्लॉगच्या नोंदी घेत.

आजचा प्रवास:
कोल्हापूर-कणकवली: ~८० किमी
कणकवली-कसाल-मालवण: ~४५ किमी
मालवण-देवगड: ~५० किमी
मुक्काम: निवांत रेसॉर्ट, कॉलेज रोड, देवगड.

खादाडी पॉइंट्स:
फोंडा गावतले टपरी हॉटेल
मालवणचे बांबू हाऊस
देवगडला वसंत-विजय (९४२०२६००७६)

8 comments:

Vaibhav Oct 8, 2009 10:24:00 PM  

Nehmipramne apratim..me kay lihu aata mitra? :-)

रोहन चौधरी ... Oct 8, 2009 11:03:00 PM  

वाचतोय वाचतोय ... लई भारी मित्रा .. ब्लॉग पोस्टसुद्धा बुंगवतो आहेस. जबर्या.. मस्तच..

बाकी मासे हाणलेस ना मस्त. काजूगराची उसळ खाल्ली की नाही.. :D इकडे चायला तोंडाला पाणी सुटलय राव.. बाकी फोटो झ्याक हां.

तो कुणकेश्वराचा - 'उसळणाऱ्या लाटा, वाळूची पुळण, काही मासेमारीच्या बोटी, थोडी सागरी धुरकट हवा' - फोटो काळजात घुसला रे.

आणि सर्वात महत्वाचे खादाडी पॉइंट्स ... :D

.... तुझ्या पुढच्या पोस्टच्या प्रतिक्षेत असलेला.

>........रोहन...पक्का भटक्या.......>

विक्रम एक शांत वादळ Oct 8, 2009 11:11:00 PM  

लय भारी
जस हाय तस लिहिलंय बगा आवडलं आपल्याला
आणि हो
बाईक ट्रिपचा शून्य नंबरचा नियम आहे ’helmets compulsory’.
हा नियम आम्ही पळत नाही सहसा परंतु यापुढे नक्की पाळणार आहे काय करणार
आम्ही सुद्धा नवीन घर बांधले आहे मागील वर्षी
जादा सांगायची गरज नाही मला वाटते

ध्रुव Oct 8, 2009 11:27:00 PM  

jamalay ha!! mi na yetach safar anubhavat ahe.
keep posting. saddhya jara busy ahe tyamule velevar vache, photo baghen ase nahi. pan I will keep the track of every post ;)

Dhruva

मनमौजी Oct 8, 2009 11:40:00 PM  

पोस्ट झॅक झाली बगा!!!! आमच्या सारख्या घास फूस वाल्यांची सॉलिड लागते. . अनुभव आहे!!!! अन् त्यात कीडे खाउ सोबतीला असतातच मैत्रीचा धर्म निभावयाला!!!

Pritam Oct 9, 2009 4:32:00 AM  

मंदिराचं वर्णन छान केलयां- "देऊळवाड्याच्या तटालाच भरतीच्या लाटा न्हाऊ घालतात. सागरतीरी सुंदर मंदिर, उसळणाऱ्या लाटा, वाळूची पुळण, काही मासेमारीच्या बोटी, थोडी सागरी धुरकट हवा"... मजा आली. आणी आयला मच्छीचं नाव ऐकवुन पाणीच सोडलं राव तोंडाला.... आता रात्री कुठेतरी ’सोय’ करावी लागेल..... बाकी पोस्ट छान जमलीय... नेहमीसारखी.... पुढच्या पोस्ट ची वाट बघतोय.

Anonymous,  Oct 20, 2009 2:23:00 AM  

Khupach sundar varnan...Tushar

Post a Comment