पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत

Sunday, January 17, 2010

शेवटी मी आणि भुंगाने जी चर्चा केली होती आणि ब्लॉगवर मतदान घेतले होते ती ब्लॉगमीट सुरेश पेठे काका आणि अनिकेत समुद्रच्या भरीव कामाने फळास आली. त्यात विक्रांत देशमुखचा पण सिंहाचा वाटा. आणि तुम्हां सर्व ब्लॉगर्सचाही. पेठे काकांनी पोस्ट टाकल्यावर जिथे आम्ही ८-१० लोक येतील अशी अपेक्षा ठेवली होती तिथे साधारण पन्नास लोकांनी आपली उपस्थिती कळवली. आता एवढे लोक येणार म्हटल्यावर काही तरी तयारी तर पाहिजे ना. म्हणून मग आम्ही मेलामेली चालू केली आणि एकत्रित प्रयत्नांतून लोकसता (मुंबई आवृत्ती), इ-सकाळ, (मुद्रित) सकाळ (आणि अशा अजून काही) वृत्तपत्रांतून प्रसिद्धी मिळाली. या बातम्यांचा पण मेळाव्याला खूप फायदा झाला. त्याबद्दल लोकसत्ताची टीम, सकाळमधून संग्राम फडणीस आणि टीम, मिररचे नितीन आणि आम्हांला ज्यांनी ही बातमी मराठी जनांपर्यंत पोचवण्यास मदत केली त्यांचे "मराठी मंडळी ब्लॉगर्स संघ"(?) तर्फे हार्दिक आभार. त्याचबरोबर ’स्टारमाझा’कडून प्रसन्न जोशी, त्यांचे सहकारी योगेश (हिंदुस्तान टाईम्स) यांचेही आभार.

आता या मेळाव्याच्या बातमीच्या निमित्ताने आम्ही समस्त ज्ञात-अज्ञात ब्लॉगलेखक-वाचकांच्या अपेक्षा आधीच वाढवून ठेवल्या असल्याकारणाने त्याची तयारी करणे आलेच. निदान काहीतरी कच्ची कार्यक्रमपत्रिका आणि मसुदा तरी हवाच या विचाराने आम्ही मध्यवर्ती ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी भेटायचे ठरवले. बालगंधर्वचे उपाहारगृहाची जागा निवडली. आम्ही मेलवर अगदी गप्पा मारत असलो तरी प्रत्यक्षात प्रथमच भेटत होतो. अनिकेत नेहमीप्रमाणे त्याच्या सायकलवर (आणि त्या वेषात) आला. भुंगाला तर मी पाहिल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती, "अबब...!!! अरे... केवढा आहेस तू?" पेठे काका आणि विक्रांतला नमस्कार झाल्यावर आम्ही बसून कार्यक्रमनिश्चिती केली. आणि ’द डे’ला थोडे लवकर म्हणजे साडेतीनला भेटायचे नक्की केले.

सकाळपासून माझी कामं उरकत, धावपळ करत कसाबसा मी चुरगाळलेला झब्बा घालून उद्यानात पोचलो. अनिकेत आणि भुंगा (दिपक) आलेच होते. गार्डने थोडी वाट पहायला लावली. त्याचा सरकारी खाक्या "४:०० शिवाय गेट नाही उघडणार." मग बाकी मंडळी पण हळूहळू येऊन पोचली. आणि आम्ही आत प्रवेशते झालो. आधीच अनिकेतने पुणेरी सूचना देऊन ठेवल्यामुळे आपापले तिकीट काढले प्रत्येकाने :-) .

उद्यान नेहमीप्रमाणे सुंदर आणि स्वच्छ होतेच. पण आता त्या मोठ्या झोपडीवर एकदम तीस लोकांचा हल्ला पाहून तिथे आराम करत असलेले सुरक्षा रक्षक तिथून "कलटी" झाले आणि झोपडीवर आम्ही ताबा मिळवला. त्यात कुठून तरी काहीतरी पेटवल्याने धूर निघाला आणि धूर आणि प्रकाशाचा खेळ पाहून माझ्यातला कॅमेरा जागा झाला.



साडेचारपर्यंत वाट पाहून एकदम पुणेरी वेळेत म्हणजे ४:३१ ला कार्यक्रम सुरु केला. प्रत्येकाने एका रजिस्टरवर आपले नाव आणि ब्लॉगची ओळख करुन दिली. त्याचा उपयोग आपण ब्लॉगर्स जे व्यासपीठ तयार करत आहोत त्या कामी एक माहितीसाठा म्हणून केला जाईल. अनिकेतने प्रथम आमची ओळख करुन दिली आणि पेठे काकांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्याचा उद्देश जाहीर केला. त्यानंतर प्रसन्न जोशी आणि त्यांचे ’माध्यमाईट्स’च्या सहकाऱ्यांनी (योगेश आणि नितीन) मनोगत व्यक्त केले आणि या ब्लॉगसाहित्याला मराठी साहित्य विश्वात स्थान मिळवून देण्यासाठीची कळकळ व्यक्त केली. हे सर्व अपडेट्स मी SMS द्वारे आणि प्रभास ट्वीटरवरुन देत होतो.

आता प्रत्येक ब्लॉगर आपल्या ब्लॉगची थोडक्यात ओळख आणि खरे नाव सांगत होता. नेहमी भुंगा, एक अनामिक, बेदुंध, भटकंती अशा नावाने ओळखणारे आम्ही आता खरे नाव माहीत करुन घेत होतो. एकदम मज्जा मज्जा :-) त्यानंतर एक अनौपचारिक चर्चांचे सत्र रंगले. जो तो आपापला आवडता ब्लॉगलेखक शोधून त्याच्याशी बोलून ब्लॉगची प्रशंसा करत होता. प्रशंसा मिळवण्यात भुंगा, अनिकेत आघाडीवर होते. काहींनी ज्या काही टेक्निकल शंका उपस्थित केल्या त्यांचेही निराकरण तज्ञांनी केले. ब्लॉग डिझाइन आणि टेंप्लेटबद्दल भुंगा, भटकंतीबद्दल मी, पुणेरी सूचनांसाठी मी अशा अनेक लोकांशी लोक बोलायला उत्सुक दिसले. आता माझ्याशी बोलून त्यांच्या ज्ञानात काय भर पडणार होती ते त्यांनाच ठाऊक. असो. पण एकदम मजा आली. राजा शिवाजी.कॉमच्या मिलिंद वेर्लेकरांशी पण खूप दिवसानंतर भेट झाली. एकंदर ही मीट फारच फलदायी ठरली. मेळाव्यादरम्यान आणि मेळाव्याच्या शेवटी ज्या काही गप्पा झाल्या त्यात प्रमुख खालील मुद्दे चर्चिले गेले.
  • मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणणे कसे गरजेचे आहे?
  • त्यासाठी काय करावे लागेल? एक ग्रुप स्थापन केला जावा.
  • ब्लॉगचोरी रोखण्यासाठी काय करता येईल?
  • मराठी ब्लॉगर्सच्या मदतीसाठी एक ऑनलाईन फोरम (चर्चासत्र) चालू करण्याचा विचार आहे. तावर आम्ही काम करत आहोत. तत्संबंधी लवकरच आम्ही माहिती जाहीर करु.
  • साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉग या साहित्यप्रकाराचा ऊहापोह व्हावा अशा अर्थाचा ठराव संमत केला गेला. आणि त्याची प्रत लवकरच नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्याकडे सुपुर्द करण्यात येईल.
  • यंदाच्या साहित्य संमेलनात मराठी ब्लॉगर्सतर्फे एक स्टॉल उभारण्यात यावा.
  • या उपक्रमाची माहिती पत्रकार विश्वाला व्हावी म्हणून एक पत्रकार परिषद आयोजित केली जावी.
खरे तर माझे काम फक्त फोटो दाखवण्याचे होते. पण केला थोडा आगाऊपणा. अधिक माहिती अनिकेतने दिली आहेच. तर मग आता फोटो पण पाहा.



 

खरंच आजच्या मेळाव्याला लक्षणीय प्रतिसाद लाभला. पन्नास साठ लोक आणि ते पण पहिल्याच मेळाव्याला म्हणजे पदार्पणातच सेंच्युरी मारल्यासारखे आहे. पुणे, मुंबई, फलटण अशा अनेक ठिकाणांहून ब्लॉगलेखकांनी तर हजेरी लावलच. पण ज्यांचा ब्लॉग नाहीये पण सुरु करायचा आहे किंवा नियमित वाचक आहेत अशांनीही आजचा "दीस गोड केला". विक्रांतच्या म्हणण्याप्रमाणे मराठी ब्लॉगिंगच्या इतिहासात नोंद व्हावी असा हा दिवस होता. पहिला-वहिला ब्लॉगर्स स्नेहमेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला. हीच भावी उज्ज्वल मराठी ब्लॉगयुगाची नांदी म्हणायला हरकत नाही.

शेवटी आयोजकांची काही चर्चा झाली (येईल येईल, लवकरच बाहेर येईल), ठरावाचा मसुदा तयार झाला, आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवून मी घराकडे जायला बाईकला टांग मारली (इ-सकाळची ताजी बातमी वाचण्यासाठी)...!!!

आज डीएनए ला पण बातमी आली.

अवांतर: पेठे काकांनी तिळगूळ आणि कुणीतरी महिला मंडळाकडून तिळाच्या वड्या आल्या होत्या. मला फक्त दोन(च) वड्या मिळाल्या. आणखी मिळतील का हो?

24 comments:

सिद्धार्थ Jan 17, 2010 10:24:00 AM  

अरे हे काय दोनच फोटो?(तो धुराचा धरला नाही) आणि अजुन वड्या मिळाल्या नां तर माझ्या नावाने एक खा.

भानस Jan 17, 2010 11:39:00 AM  

पंकज पहिलाच फोटो अप्रतिम आहे.:) सगळ्यांकडून सविस्तर माहिती मिळते आहे त्यामुळे आमच्यासारख्या न येऊ शकलेल्या लोकांना निदान फोटो-चित्रफिती व वृत्तांन्तामधून तरी घडामोडी कळत आहेत हेही नसे थोडके असे झाले आहे.त्याबद्दल सगळ्यांचेच अनेक आभार. अजून फोटो येऊ देत. वाट पाहत आहे.

रोहन चौधरी ... Jan 17, 2010 12:17:00 PM  

अरे ... चुकवला रे आम्ही असतो तिकडे भारतात तर नक्की आलो असतो... :( असो. मस्त झाला ना कार्यक्रम... आनंद आहे आम्हास.

'मिलिंद' सुद्धा आला होता हे ऐकून बरे वाटले. तो फोटो मस्त आहे.

आणि हो तिळवडया 'गौरी'ने आणल्या होत्या अशी बातमी आम्हापर्यंत येउन पोचली आहे. हेहे..

हेरंब Jan 17, 2010 3:34:00 PM  

सही रे. मस्तच. सगळ्यांचे अपडेट्स आत्ताच वाचले. खूप मजा केलीत ना...

अपर्णा Jan 17, 2010 6:45:00 PM  

ब्लॉगर्स मीटची माहिती लगेच कळवल्याबद्द्ल खूप आभार...

tanvi Jan 17, 2010 7:34:00 PM  

पंकज तू आहेस यू-ट्यूबवरच्या व्हिडिओत....ते पाहून माझा लेक म्हणाला मम्मा हा मिशीवाला कोण???

मजा आली असेन ना!!! एक वेगळाच अनुभव...चला प्रत्यक्ष नाही तरी तुमच्या लेखनातून आणि फोटोतून पहातो आम्ही..........

अमोल केळकर Jan 17, 2010 7:58:00 PM  

पहिला मराठी ब्लॉगर्सचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. पुढील काळात प्रत्यक्षपणे सहभागी होण्यास उत्सुक आहे. अधिक माहिती देत रहालच याची खात्री आहे.

आपला

अमोल केळकर

Mugdha Jan 17, 2010 8:54:00 PM  

पहिला फोटो मस्तं..! पण हे काय? दोनच फोटोंवर भूक भागवावी लागली..:(
आणि हो..आता पुढला मेळावा इंटरनेटच्या माध्यमातून व्हावा अशी इच्छा आहे..म्हणजे भारतात आणि बाहेर असलेल्या बर्याचशा ब्लोगर्स ना भाग घेता येईल...अनिकेतला बोललीए मी याबाबतीत..तुझं काय मत आहे हे नक्की कळव...

Pankaj - भटकंती Unlimited Jan 17, 2010 9:01:00 PM  

सिद्धार्थ, भानस, मुग्धा:

आहेत अजूनही फोटो आहेत वैभवच्या ब्लॉगवर. ही त्याची लिंक: http://www.vaibhavbhosale.com/2010/01/blog-post_17.html
ऑनलाईन मेळाव्याचं पण काही तरी नक्की पाहू.

रोहन, मिलिंदना भेटणे ही एक पर्वणीच होती आमच्यासाठी. गौरीचे आभार तिळवड्यांसाठी.

हेरंब, अपर्णा, अमोल: ही तर सुरुवात आहे. आणि डेब्यू मॅचला सेंच्युरी हाणलीये आपण.

तन्वी, आभार. त्या व्हिडिओमध्ये मी किती नर्व्हस दिसतोय. लेकाला सांग हा मिशीवाला एक कलंदर भटक्या आहे. दुसरी अशी विशेष ओळख नाही.

Gouri Jan 17, 2010 9:48:00 PM  

pankaj, oficial melavasampalyavar tu bepatta jhalas. tyamule aapalyaalaa bolataa aale naahi. (tyamule tula ajoon tilavadya milalya nahit :) )

tula to pahila photo kadhatana baghunach mala vatale hote ha jaticha photographer aahe mhanoon ... kaay dhurache katakat aahe ase mhananyaaivaji tya dhuramule yenara dhukyacha effect phakt photographer la ch disato ase majhe mat aahe :)

कांचन कराई Jan 17, 2010 10:11:00 PM  

वा! पंकज, तु दिलेला वृत्तांत एकदम आवडला बघ! असं वाटत होतं तिथेच आहे मी. मी कार्यक्रम मिस केला :( फोटो नेहमीप्रमाणे छान. पण अजुन अपलोड कर ना! शप्पथ, तू मिलिंद वेर्लेकरांना भेटलास?! ऑनलाईन फोरमची कल्पना मला आवडली. ब्लॉगचोरी रोखण्यासाठी नाही, पण उपाय म्हणून एक कल्पना डोक्यात आहे. योग्य वेळ आली की सांगेन.

Vikrant Deshmukh... Jan 17, 2010 10:13:00 PM  

एकदम रापचिक रे !!!!!!!! मस्त वृत्तांत दिलास...

Pankaj - भटकंती Unlimited Jan 17, 2010 10:22:00 PM  

गौरी, ऑफिशिअल मेळाव्यानंतर काही भेटी-गाठी चालू झाल्या. काही बाहेरगावाहून आलेले होते. शिवाय इ-सकालचे सम्राट फडणीस, राजाशिवाजी.कॉमचे मिलिंद वेर्लेकर यांच्याशी पण खूप ओझरत्या गप्पा झाल्या. पण त्या ग्रुप फोटो आणि इतर वेळी होतो की मी तिथे. आपले लक्ष नव्हते. फोटो बद्दल सांगायचे तर या ब्लॉगच्या आधीपासून फोटोगिरी करतोय. वळणाचे पाणे शेवटी वळणालाच जाणार :-)

विक्रू, धन्यवाद. बाय द वे तो सोनेरी बॉलपेन मिळाला का तुला? दिवस लिहायला?

नीरजा पटवर्धन Jan 18, 2010 12:37:00 AM  

http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2010/01/blog-post.html

mi ithe vruttant takalay re.

Vikrant Deshmukh... Jan 18, 2010 1:21:00 AM  

मिळेल रे... तो सोनेरी पेन पण मिळेल.. आता एवढे पाऊल उचलले आहे तर ये क्या बात है?
बाय द वे, मी पण लिंक टाकल्या आहेत माझ्या ब्लॉगवर... आणि व्हीडीओ झक्कास बर का !!!!!

marathmola Jan 18, 2010 1:35:00 AM  

ब्लॉगर्सच्या मेळाव्याला यायचे सकाळी ठरविले. पण अचानक महत्वाचे काम उपटले आणि राहून गेले. तुम्ही मंडळी ह्या निमित्ताने मराठीची जाण आणि पोज वाढवित आहेत याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. माझा ब्लॉग निमित्त आहे.www.subhashinamdar.blogspot.com तुमच्या कार्यात पहभागी होण्याची इच्छा आहे. माझा उपयोग झाला तर आनंदच वाटेल. पुढची प्रगती जरूर कऴवा. त्यासाठी माझा मेल आहे.subhashinamdar@gmail.com

anukshre Jan 18, 2010 4:25:00 AM  

पंकज छान माहिती दिलीस. कोणाची नावे का नाहीत. असो पाहून तरी भेटलोच न. भानस ने सर्व भावना व्यक्त केल्या आहेच. कळवत राहा सर्व घडामोडी. आमची आठवण काढली कि नाहीत? इकडे मानाने मी कधीच मीट ला गेले होते. गौरी ने सण साजरा केला, मैत्री चा तिळगुळ आवडला.

D D Jan 18, 2010 5:05:00 AM  

नमस्कार,
मराठी ब्लॉगर्सचा हा पहिला मेळावा आयोजित करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन!

Prakash Ghatpande Jan 18, 2010 6:34:00 AM  

मेळाव्याच्या निमित्ताने स्वांतसुखाय मधुन बाहेर येण्यास मदत होईल. बरेच ब्लॊगर्स आत्मसंतुष्ट/मग्न असतात. मेळाव्याला आल्याने समाधान वाटले

Mahendra Jan 18, 2010 7:41:00 AM  

पंकज ,
व्हिडिओ पण असतिल नां? अपलोड करा यु ट्युब वर..
यायची इच्छा होती , पण कामा मुळे जमलं नाही... पुढल्या वेलेस नक्की..
फोटॊ अप्रतिम . पहिला धुराचा तर बेस्ट!!

Pankaj - भटकंती Unlimited Jan 18, 2010 8:00:00 AM  

नीधपा, वृत्तांत तू सांगायच्या आधीच वाचलाय :-) (कार्टं आधीपासून आगाऊ आहे).

विक्रांत, मला माहीत नव्हते तो सकाळवाला आहे म्हणून. मला वाटले आपल्यातलाच कुणी आहे. सम्राट तर माझ्याबरोबर होता. मग तो कोण होता काय माहीत.

आदिती, तो उपाय लवकर जाहीर कर. आम्ही पण मिस्ड यू.

मराठामोळे काका, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊनच चालायचे आहे. पुढल्या वेळी नक्की या.

अनुजा, तुमची आठवण काढायला आधी विसरावे लागले असते :-) प्रास्ताविकातच आपले नाव होते.

प्रकाशजी, DD: धन्यवाद.

महेंद्र काका, तुम्हाला मिस केले राव. लवकरच तुम्हांला सामील करुन घेणार. व्हिडिओ डिपार्टमेंट रानडे काका.

Samrat Phadnis Jan 19, 2010 1:28:00 AM  

पंकज आणि समस्त ब्लॉगर्स परिवार,
बातम्यांपेक्षा तुमचे सर्वांचे वृत्तांत भन्नाट. तिथे न केलेली कदाचित थोडी आगावू सूचना किंवा काहीही समज. पण, करावीशी वाटते. हे साहित्य संमेलनाचे आपल्याला पचले आणि पटले नाही. आपण ब्लॉग का लिहितो?, याचा थोडा (स्वतःच्याच) आत शिरून विचार केला, तर आपल्याला प्रस्थापित माध्यमांमधून जसे हवे, तसे व्यक्त होता येत नाही म्हणून. किंवा त्यातील गोष्टींपेक्षा आपली स्वतःची स्वतंत्र ओळख हवी म्हणून. ब्लॉगला साहित्य म्हणा, असे आपण ओरडून कशाला सांगायला हवे? ज्यांना वाटेल, त्यांना वाटू दे. ज्यांना नाही वाटत त्यांना सोडून देऊ. समजा द. भि. न्नी उल्लेख केला, किंवा नाही केला, तरीही तुझ्या-माझ्या ब्लॉगिंगमध्ये काही फरक पडणार आहे का? शंभरातले नव्वाण्णव साहित्यिक (त्यांच्या साहित्यकृतीबद्दल पूर्ण आदर आहे, तरीही) ई मेल आणि वेबसाईटमध्ये फरक करू शकत नाहीत. त्यांनी तुम्हाला साहित्यिक म्हटले काय किंवा नाही म्हटले काय, काय फरक पडणार आहे? त्यामुळे मला वाटते, की आपण इन्फॉर्मल जेवढे राहू, तेवढे ब्लॉगिंग जास्त टवटवीत, रसरशीत आणि जिवंत वाटेल. परवा भेटलो, तसे इन्फॉर्मल भेटत राहणे आणि ब्लॉगर्स वाढविणे, नव्या ब्लॉगर्सना नवी विजेटस् शिकवणे अशा गोष्टी आपण करू शकू.

हे सगळे वैयक्तिक विचार.

पटले, तर पटले...

नाही पटले, तर सोडून द्या.

विशाल तेलंग्रे Jan 20, 2010 4:07:00 AM  

पंक्या, समर्थ फडनिसांच्या अभिप्रायाशी मीदेखील सहमत आहे. "द.भि."नी मराठी साहित्य संमेलनात मराठी ब्लॉग्जविषयी संबोधन करणे किंवा थोडं काही बोलणं हे खुपच चांगलं होईल, कारण अध्यक्षांच्या भाषणाला खरंच खुप मान असतो. पण जर तसं नाही जरी झालं तरी आपण थोडीच ब्लॉगिंग सोडणार आहोत...?? बाय द वे, तुमचे फोटोज एकदम झकास आलेत. मी जरी आलो नव्हतो तरी प्रभास सरांच्या लाईव्ह ट्विट्स द्वारे सगळा वृत्तांत लगेच कळत होता. मला खुप दुःख आहे, न आल्याचं... पण पुढच्या मेळाव्याच्या वेळी येण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करीन...
अन एका फोटोत तुझ्या मिश्या बघितल्या, खरा मराठी माणूस शोभतोस तू... ;)

- विशल्या!

prajkta Jan 23, 2010 1:11:00 PM  

सर्व ब्लॉगर्सना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! पुण्यातील कार्यक्रमाला ज्यांना उपस्थिती लावता आली त्या सर्व ब्लॉगर्सचा अक्षरशः हेवा वाटतो. एकूण वृत्तांत वाचल्यानंतर तेथे खूपच सुंदर गप्पा रंगल्या असणार याचा अंदाज येतो. असो आता केवळ उसासे सोडण्याशिवाय हातात काहीही नाही. पुढच्या वेळी मात्र ही संधी नक्कीच चुकविणार नाही. एका वेगळ्या विश्‍वाचा अनुभव या वेळी घेता आला नाही याने मन खट्टू जरूर आहे; पण हा उपक्रम सुखावह असाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपणा सर्वांना कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवायचे नाही. आपल्या भावना इतरांसोबत "शेअर' करावयाच्या आहेत आणि त्यासाठी ब्लॉगींग करावयाचे आहे हे महत्त्वाचे. त्यामुळे सर्वच लिखाण करत राहू, संवाद साधत राहू. सर्वांना खूप-खूप शुभेच्छा.

Post a Comment